तरुणांना वेगवेगळया कल्पना मांडण्यासाठी 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' हक्काचे व्यासपीठ

 तरुणांना वेगवेगळया कल्पना मांडण्यासाठी 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' हक्काचे व्यासपीठ

Tuesday December 27, 2016,

3 min Read

'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' कार्यक्रमाद्वारे ५०० विविध महाविद्यालयांमध्ये विकासाच्या १२ घटकांवर संकल्पना मागविल्या असून उत्कृष्ट संकल्पनांची शासन अंमलबजावणी करणार आहे. वेगवेगळया कल्पना मांडण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हे हक्काचे व्यासपीठ असून यात प्रत्येकाने आपल्या कल्पना मांडण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईतील पवई येथील आयआयटीच्या मूड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित आयआयटी विदयार्थ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते http://transformmaharashtra.com/ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सूत्रसंचालक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छोटी मुलाखतही घेतली. या मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराला येथे उपस्थित विदयार्थ्यांनी दाद दिली.

image


पुढील ५ वर्षात देशाला 'कॅशलेस नेशन' बनविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग द्यावा, जेणेकरुन मजूर, शेतकरी आणि सर्वसामान्यांना याचा लाभ मिळेल. डिजिटल पेमेंटसला प्राधान्य देताना आजच्या तरुणाईने कॅशलेस भारत घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

देशभक्तीचा एक भाग म्हणून आजच्या तरुणांनी पुढे येऊन कमीत कमी प्रत्येकी २० जणांना डिजिटल पेमेंटस पद्धती समजावून सांगावी, त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाबाबत साक्षर करावे जेणेकरून डिजिटल पेमेंटसबद्दल जनजागृती वाढेल आणि असे जर झाले तर कॅशलेसच्या क्षेत्रात आपला देश आगामी काळात पुढे राहील. ८नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. या नोटबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टचाराला आळा बसणार असून भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे ते उचललेले महत्वाचे पाऊल असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक पिढीच्या वेगळ्या कल्पना असतात, आजची देशाची लोकसंख्या पाहता युवकांची संख्या मोठी आहे. युवकांच्या कल्पना आणि कौशल्य देशाची नवी ओळख निर्माण करेल. हे करत असताना प्रगतीच्या आड येणारे गरीबी, शिक्षणाचा अभाव या घटकांचा देखील विचार करावा लागेल.या सगळ्या घटकांवर मार्ग काढून आपल्याला पुढे जावे लागेल. आमच्या शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नावाची कल्पना मांडली, या कल्पनेला युवा वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, या कार्यक्रमातून तरुणांनी राज्याच्या विकासात मोठा सहभाग नोंदवला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

image


मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आज आयआयटी मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विदयार्थ्यांना शासन सेवेत येऊन विकास प्रक्रियेचा भाग व्हायचे आहे ही आनंदाची बाब आहे. आज आयआयटी पवई येथे आल्याने आणि इथे जमलेल्या विदयार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कळले की आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत येण्यास उत्सुक आहात. आपले कौशल्य आणि विकासाच्या वेगळ्या संकल्पनांचे राज्य शासनामार्फत स्वागत करून या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमा दरम्यान सूत्रसंचालक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मी भारताच्या संविधानाचा अनुयायी आहे, मी संविधानाचे अनुसरण करतो. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, बदल घडविण्यासाठी राजकारणात पदावर असणे आवश्यक आहे. आजचे तरुण त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेच्या आधारेच पुढे जाऊ शकतात हे खरे आहे. त्यामुळे व्यक्तीमधली गुणवत्ता यालाच प्राधान्य आहे. आजही महाराष्ट्रातील काही वर्ग अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही. या प्रवाहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी त्यांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आरक्षण देणे ही गरज आहे. यापूर्वी आयआयटीएन्स विद्यार्थ्यांसाठी शासन सेवा हा करियरचा शेवटचा पर्याय असायचा मात्र आता हे बदलेले चित्र सुखावह असल्याचे सांगितले.

'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' याबाबत काही महत्वाचे मुददे

• ॲक्शन फॉर कलेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन या उपक्रमाअंतर्गत मूड इंडिगो मार्फत महाराष्ट्राच्या बदलत्या जडणघडणीचा विषय घेण्यात आला आहे.

• यावेळी ५०० महाविदयालयातील विदयार्थ्यांचा सहभाग यामध्ये असणार आहे.

• राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी, शाश्वत विकासासाठी तरुण वर्गाची कल्पकता व ऊर्जा यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शासनाच्या कामकाजात लोकसहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

• या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ११ मुख्य समस्यांवर उपाय करण्यासाठी विदयार्थी आपले जे मत व्यक्त करतील, त्यानुसार राज्यातील विकासाची योजना बनवण्यात येणार आहे.

• राज्यातील विकासाविषयी युवकांचे मत नेमके काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे वाटते. या उपक्रमादवारे युवकांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सुरु केला आहे. (सौजन्य - महान्युज)