संसाराची गाडी चालवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांशी मैत्री करणारी कविता

संसाराची गाडी चालवण्यासाठी मुंबईच्या

रस्त्यांशी मैत्री करणारी कविता

Friday April 15, 2016,

4 min Read

आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी नाही व त्याचे समाजाला अप्रूप पण वाटत नाही. पण गरज पडल्यावर कविता यांनी ज्या पेशाला आपलेसे केले तो फक्त चर्चेचा विषय नसून दुसऱ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. एक अशी कहाणी जी अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत स्वाभिमानाने जगण्याचा उपदेश देत आहे. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त नांदेड भागात राहणाऱ्या कविता ज्यांनी आपल्या गावाबाहेरचे जग कधी बघितले नव्हते, त्यांच्या लग्नानंतर मुंबई सारख्या शहरात आल्यावर त्या मात्र गांगरून गेल्या. संसाराची गाडी रुळावर चालत असतांनाच त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर घरातील परिस्थिती बदलू लागली. मानसिक रूपाने अस्वस्थ असलेल्या मुलाच्या दवाखान्याच्या उपचारांवरच नवऱ्याची कमाई संपून जात असे. घरखर्चासाठी तसेच मुलीच्या शिक्षणासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. दहावी पास कविता कोणतीही छोटी मोठी नोकरी करू शकत होत्या पण मुलाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला सोडून ८-१० तासांची नोकरी ती करू शकत नव्हत्या. दुसरा पर्याय होता झाडू पोछ्याचे काम, जे कविताला करायचे नव्हते. अशा कठीण परिस्थितीत रिक्षा चालक पतीने रिक्षा चालवण्याचा पर्याय सुचवला, परंतु मुंबई सारख्या शहरात रिक्षा चालवणे हे कविताला एव्हेरेस्ट सर करण्यापेक्षा कमी नव्हते.

image


कविता सांगतात की, ‘मी कधीही आमच्या गावातून बाहेर गेले नव्हते. मला सायकल सुद्धा चालवता येत नव्हती. आमच्या गावातील गल्ली-बोळही मला नीट लक्षात रहात नसायचे आणि आज मी मुंबईच्या रस्त्यांवर बेधडक रिक्षा चालवीत आहे. घरखर्च भागवण्यास नवऱ्याला मदत करीत आहे. माझ्यावर अपंग मुलाच्या उपचारांची जबाबदारी आहे, पण मी हिंमत हारले नाही व परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला.’

मुंबई जवळच्या ठाण्यातील वर्तकनगरच्या भागात सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कविता प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवतात. कविता यांचे घर सुद्धा याच भागात असल्यामुळे दुपारी मुलांबरोबर त्या घरी जेवण्यास हजर असतात. एक वर्षाचा अनुभव आता त्यांच्या पाठीशी जमा झाला आहे. आपल्या सुरुवातीच्या आठवणींबद्दल कविता आजपण भावूक होतात, ‘एवढ्या मोठ्या शहरात रिक्षा चालवण्याच्या कल्पनेने सुद्धा मला भीती वाटायची पण मी स्वतःच्या मनाची तयारी केली. माझ्या आतील भीतीला दूर झोकले व सहा महिन्यातच रिक्षा चालवायला शिकले.’

image


कविता यांच्यासमोर अनेक अडचणी आल्या ज्यामुळे कुणाचीही हिंमत डगमगू शकेल, पण त्यांचा निश्चय पक्का होता व त्यामुळेच त्यांच्या नवऱ्याने त्यांना रिक्षा चालवण्यास शिकवली. त्यांच्या या निर्णयाने काही लोकांचे पोट दुखू लागले. हे पक्के असते जेव्हा एखादी व्यक्ती प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिचे पाय मागे ओढण्या-यांची संख्या मोठी असते. कविता यांच्या बाबतीत सुद्धा काहीसे असेच घडले. त्यांची रिक्षा भाड्याची होती, कुणीतरी मालकाचे कान भरले मग काय त्याने रिक्षा काढून घेतली. रिक्षाचा उपयोग कविताला शिकण्यासाठी होत असल्यामुळे असाच नकार दुसरीकडून पण आला. त्यामुळेच कविता यांचा निश्चय अजूनच दृढ होत गेला. यावेळी त्यांनी तिसरी रिक्षा भाड्याने घेतली व स्वाभिमानी कविता या पतीच्या सहयोगाने सहा महिन्यातच रिक्षा चालवण्यास शिकल्या. पण अडचणी संपत नव्हत्या, खरी परीक्षा तर आता सुरु झाली होती.

image


कविता सांगतात की, ‘जेव्हा मी रिक्षा घेऊन रस्त्यावर निघाले तेव्हा मी एक अशा क्षेत्रात पाऊल टाकले होते जिथे पुरुषांचे एककलमी वर्चस्व होते. अनेक वेळा माझी टर उडवली जायची की आमच्या धंद्यात स्त्रियांची गरज नाही. ही आपला हक्क हिरावून घेत आहे, कुणी हसायचे, टोमणे मारायचे पण काही प्रवाशी असे भेटले की ज्यांनी माझ्या कामामुळे पाठ थोपटली, आशीर्वाद दिला, चांगले काम करीत आहे असा अभिप्राय दिला.’ कविता यांची मुलगी आठ वर्षाची आहे व त्यांच्या अनुपस्थितीत ती आपल्या छोट्या भावाची काळजी घेते. दुपारी आपल्या कामातून वेळ काढून कविता मुलांना वेळ देतात. त्या घरी नसल्यावर शेजारीपण त्यांच्या मुलांकडे थोडावेळ लक्ष देतात. सध्या त्यांच्याकडे भाड्याची रिक्षा असून त्यांना रिक्षाचे परमिट मिळाले आहे त्यामुळे आता काही दिवसातच त्यांची स्वतःची व हक्काची रिक्षा असेल.

आत्मविश्वास व उत्साह ओसंडून वाहणाऱ्या कविताची कहाणी सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. अतिशय कठीण परिस्थितीचाही सामना केला जावू शकतो गरज आहे ती फक्त विश्वास व हिंमतीची. कविताचे आयुष्य हे सगळ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे जे अडचणींच्या काळात चुकीचे पाऊल उचलतात किंवा हार मानतात. आज कविता आपल्या आयुष्यात खुश आहे आणि रिक्षा चालवण्याबरोबरच त्या आपल्या संसाराची गाडी सुद्धा खंबीरपणे पुढे चालवत आहेत.  

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

पोलिस शिपाईची नोकरी सांभाळून रेल्वे अपघातातील ५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नयना दिवेकर

रात्र गस्तीच्या वेळी तान्ह्या मुलीला सोबत घेऊन जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी 'अर्चना झा'

आशेवर दुनिया कायम आहे, अपंगत्वावर मात करणा-या लजरिना बजाज!

लेखिका : शिखा चौहान

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close