मृत्यू हे जीवनाचं सत्य आहे. असं सत्य ज्याला एक ना एक दिवस प्रत्येकाला सामोरं जावं लागणारेय. पण जेव्हा मृत्यू हा शब्द उच्चारला जातो तेव्हा मनात भिती निर्माण होते. जेव्हा जन्म होतो तेव्हा आनंदीआनंद असतो. पण मृत्यू समोर दिसायला लागतो किंवा तो आकस्मात येतो तेव्हा दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबियांना काय करावं हेच कळत नाही. जवळच्या नातेवाईंकाना, ओळखी-पाळखीच्या लोकांना बोलवण्याची शुध्दही राहत नाही. आपलं असं कुणी जग सोडून गेल्यानंतर दु:खाच्या या क्षणी नक्की काय करावं हेच सुचत नाही. दुसरीकडे मुंबई आणि इतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या वृध्दांची संख्या वाढतेय. कधी स्वत:, कधी परिस्थितीमुळे तर कधी आपण कोणावर ओझं होऊ नये म्हणून हे वृध्द एकटे राहणे पसंत करतात. अश्यावेळी त्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांना कोण कळवणार? त्याचे अंत्यसंस्कार कोण करणार? याचाच विचार करुन मुंबईतल्या संजय रामगुडे, पुंडलिक लोकरे आणि भारती महेश चव्हाण यांनी अंत्यसंस्काराचं म्हणजेच फ्युनरलचं मॅनेजमेन्ट करणारी कंपनी सुरु केलीय. सुखांत फ्युनरल मॅनेजमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव. ही कंपनी तुमच्या अंत्यसंस्काराचं मॅनेजमेन्ट करते. अगदी नातेवाईकांना खबर देण्यापासून ते अत्यसंस्कार आणि त्यानंतर वर्षश्राध्दापर्यंत सर्वकाही सुखांत करते हे विशेष.
संजय रामगुडे सांगतात, "सुखांतने तीन हजार लोकांचं सर्वेक्षण केलंय. यापैकी ७० टक्के लोक हे एकटे राहतात. त्यांची मुलं परदेशात असतात. त्याचं वय पाहता कधीही काहीही होऊ शकते. अश्यावेळी सुखांत कामी येतं. आम्ही अंत्यसंस्काराच्या तयारीपासून ते नातेवाईकांना कळवण्यापर्यंत आणि जे येऊ शकत नाहीत त्यांना फोटो पाठवण्यापर्यंत सर्व जबाबदारी स्वीकारतो”
यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
शेवटचा दिस गोड व्हावा...
देहदानाविषयी जनजागृतीसाठी सक्रीय ‘दधीचि देहदान मंडळ’
४६ वर्षापासून अविरतपणे निराधारांची मदत करणारे अमरजीत सिंह सूदन
धावत्या जगामुळे आपला सभोवताल अगदी आभासी बनला आहे. कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांशी बोलयला वेळ नाही. लाईक, कमेन्टच्या दुनियेत आता एकमेकांशी थेट गप्पा मारण्याची पध्दत नामशेष झालीय. अश्यावेळी एकट्या राहणाऱ्या वृध्दांना सुखांत सारखी सेवा अगदी योग्य असल्याचं म्हटलं जातंय.
कसं काम करतं सुखांत...
सुखांतशी तुम्हाला करार करावा लागतो. त्याचं पॅकेजिंग आहे. अगदी दहा हजार सातशे रुपयांपासून ते तीस हजार रुपयांपर्यंत ज्याची जशी अपेक्षा आणि कुवत असेल तसे ते पॅकेज निवडू शकतात.
यानुसार सुखांत त्यांच्या अंत्यसंस्काराचं मॅनेजमेन्ट करते
यात रुग्णवाहिका आणण्यापासून ते अंत्यसंस्काराचं सामान, तिरडी उचलणारी माणसं, भटजी बोलवण्यापासून ते अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृत्यूप्रमाणपत्र मिळवून देईपर्यंत सर्व काही सुखांत पाहतं.
स्मशानभूमीतल्या क्लिष्ट सरकारी कागदी व्यवहारापासून कुटुंबियांची मुक्तता होते.
अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना पाणी देण्यापासून ते त्यांना स्मशानभूमीपर्यंत आणण्याचं काम ही सुखांत करतं.
सुखांतनं अंत्यसंस्काराच्या मॅनेजमेन्टची नवी क्लुप्तीही शोधून काढली आहे. ती म्हणजे तुम्ही आधीच बुकींग केल्यास तुमची एवी म्हणजेच शुटींग करुन तुमचा शेवटचा संदेश नातेवाईकांपर्यंत पोचवण्याची सोय़ करण्यात येते.
मृत्यूनंतर दहावर्षांपर्यंत स्मृतीदिनाची आठवण नातेवाईकांना करुन देण्याचं काम ही सुखांत करतं. जयंती आणि पुण्यतिथी रिमांईंडर नातेवाईकांना पाठवले जातात.
सुखांत फक्त अंत्यसंस्कार आणि त्यानंतरच्या सोपस्करापर्यंत थांबलेले नाही तर अवयवदानासाठी मोठी मोहीम सुखांतनं सुरु केलीय. यासाठी ते जनजागृती करतायत. आतापर्यंत अडीच हजारहून जास्त लोकांनी सुखांत मध्ये नोंदणी केलीय.
वरवर पाहिलं तर थोडसं अमानवीय असं वाटतं सर्वकाही पण सुखांत ही काळाची गरज आहे. जेव्हा लोक आपल्या कोषात जगतायत. जग कमी कमी होत अगदी एकट्याचं होऊ लागलंय. अश्यावेळी सुखांत तुम्हाला आपल्या नातेवाईकांशी जोडायला मदतच करते. हे सत्य आहे.