कोण म्हणतं अनेक महिला एकत्र येऊ शकत नाही?
कोण म्हणतं....की अनेक महिला एकत्र येऊ शकत नाही? या विचाराला फाटा फोडलाय भिवंडी येथील पाये गावातील महिलांनी. या महिला फक्त एकत्रच नाही आल्या तर एकत्र येऊन स्थानिक पातळीवर विविध व्यवसाय सुरू करून आपआपल्या घराला आर्थिक हातभारही लावत आहेत. त्यामुळे जर ग्रामीण भागातील महिला या फक्त चुल आणि मूलपर्यंतच असतात, असा कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे, हे सिद्ध करणारी भिवंडीतील पाये गावातील महिलांची कहाणी....
![image](https://images.yourstory.com/production/document_image/mystoryimage/lvk7NqfbR0GFygHdKTS5_kanai bachat gat bhivandi 3.jpg?fm=png&auto=format&w=800)
भिवंडी येथील पाये या गावातील कानाई बचत गटातील महिलांनी आजपर्यंत केलेल्या कार्यातून ‘हम भी किसीसे कम नाही’ असाच काय तो संदेश सर्व महिलांना दिला आहे. भिवंडी सारख्या ग्रामीण भागात केवळ विटभट्टीसारखे अनेक व्यवसाय जोराने सुरू असल्या कारणाने ज्या प्रमाणे पुरूष एखादे विट भट्टी किंवा उद्योग सांभाळतात. त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या सारखा व्यवसाय का करू शकत नाही? हा विचार मनाशी धरून अखेर पाये गावातील २० महिला एकत्र आल्या आणि एका बँकेमार्फत मिळालेल्या प्रशिक्षणाने त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीची एक नवी दिशा मिळाली. या २० महिलांनी २००१ साली एकत्र येऊन कानाई बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी सुरवातीला बँकेतून १६००० हजारांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेचा विनियोग त्यांनी विट भट्टी, टेम्पो, डम्पर आदी भाड्याने देणे, तसेच आंब्याच्या बागा घेऊन त्यांचे उत्पादन विक्री करणे, मच्छी विक्री इत्यादी कौटूंबिक व्यवसाय वाढविण्यासाठी केला आहे. विटभट्टी सारखा व्यवसाय आपण महिला का नाही सांभाळू शकत असा विचार त्यांनी आपल्या मनाशी पक्का केला आणि त्याला कृतीत उतरवण्याचे धाडसही त्यांनी दाखविले.
यातील काही महिला या रिक्षाचा व्यवसाय सांभाळतात, काही महिला डम्पर चालवितात, काही महिला या दगड फोडण्याचा व्यवसाय करतात, काही महिला या टेप्मो चालवितात, काही विट भट्टी चालवितात. अशा प्रकारे या बचत गटातील अनेक महिलांनी वेगवेगळी रूप धारण करून पुरूषांचेच व्यवसाय ते जोमाने चालवित आहेत. विशेष म्हणजे यातील मिळालेल्या नफ्यातून एक वृद्ध महिला ही भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळून आज ती तिच्या घरखर्चाला हातभार लावत आहे.
![image](https://images.yourstory.com/production/document_image/mystoryimage/33pbXjx3SM2fFjrJyKX4_kanai bachat gat bhivandi 5.jpg?fm=png&auto=format&w=800)
या महिला जशा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दिवस-रात्र झटत असतात. त्याप्रमाणे ते आपण एक समाजाचा भाग आहोत हे ते कधी विसरले नाहीत. त्यांच्या वार्षिक नफ्यातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवितात. या गटामार्फत गावातील इ. १ ते ४ थी पर्यंतच्या आदिवासी मुलींना गणवेश व इ. १ ते ७ वीच्या इयत्तेतील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षिस तर १० वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतात. एवढेच नाही तर गावांमध्ये एकाेपा राखण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी बचत गटांमार्फत गाव जेवण ठेवतात. गावांमध्ये स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येतो.
या महिला सामाजिक कार्यक्रम राबवतात त्याचप्रमाणे करमणुकीच्या कार्यक्रमातही त्या मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विविध सण साजरे करणे, गरबा, सहली इत्यादी गोष्टींचा समावेश त्यामध्ये असतो. उत्साहाचा धबधबा असणार्या या महिलांनी एक दिवस ठरवलं की, आता आपण विमानाने सहलीला जायचं. सर्वांनी एकमताने ठराव संमत केला आणि त्या तयारीला लागल्या. त्यासाठी पैसे जमा करणं सुरू झालं आणि बचत करून त्यांनी सुरुवातीला काही पैसे जमवले. या महिलांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर एकदा नाही तर दोनदा विमानाने प्रवास केला. त्यामूळे या महिलांनी घेतलेली उंच भरारी इतर महिलांपुढे आदर्श ठरली आहे. विटभट्टी, रिक्शा, दगड फोडण्याची कामे, डम्पर, फायबर बोट, तबेला आदी व्यवसाय फक्त पुरूषच नाही तर आम्ही महिला चांगल्या पद्धतीने सांभाळून त्यात प्रगती करण्याचीही धमक आम्ही ठेऊ शकतो, असे गर्वाने सांगणार्या या महिला इतर महिलांना प्रेरणा देत आहेत. आज या कानाई बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यवसायामुळे गावातील अनेक महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. आज त्या ग्रामीण भागातील चुल आणि मुल सांभाळणार्या महिलांच्या स्वाक्षरीशिवाय त्यांच्या घरातील मंडळी त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढू शकत नाही, याचा मला अभिमान वाटतो असे सांगणारे याच त्या खेड्यापाड्यातील महिला...भिवंडी येथील पाये गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या सचिव रंजना गवळी आणि खजिनदार रत्नप्रभा देवळीकर या दोघींनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.