डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125 जयंती यंदा मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. माणसाला माणूसकी दाखवणाऱ्या या महामानवाचे जगभरातले अनुयायी या दिवशी मुंबईत येणारेत. देशातच नव्हे तर जगभरात पसरलेले हे बाबासाहेबाचे अनुयायी हातात निळा झेडा घाऊन निळाई पसरवण्यासाठी सज्ज झाले आहे. जगात जिथं असतील तिथं बाबासाहेबांना मानवंदना देण्याची तयारी करण्यात आलीय. यात एक कार्यक्रम अगदी खास आहे. तो म्हणजे 14 एप्रिलला राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात येणार आहे. कमानी ट्युब्सच्या सर्वेसर्वा कल्पना सरोज यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. बाबासाहेंबांना अभिवादन करण्यासाठी सुमारे 156 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्र प्रतिनिधी इथं येणार आहेत.
डिक्कीच्या 5 व्या राष्ट्रीय एक्स्पोत सहभागी होण्यासाठी आलेल्या कल्पना सरोज यांनी या संदर्भातली भुमिका मांडली. ‘’ भारतातील दलितांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलांवर मांडण्याचा बाबासाहेंबांचा प्रयत्न होता. राष्ट्रसंघा तसं करता येऊ शकत का? अफ्रिकन अमेरिकन लोकांसोबत दलितांच्या प्रश्नांना जागतिक व्यासपीठावरुन वाचा फोडता येऊ शकते का? याची चाचपणी त्यांनी विलियम एडवर्ड बुरघार्ट यांच्यासारख्या विचारवंतांला पत्र लिहून केली होती. पण बाबासाहेंबाना ते करता आलं नाही. आता त्यांची 125 जयंती निमित्त या कार्यक्रमाची आखणी करण्यात आलीय.
यासाठी थेट परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या कार्यक्रमाची संकल्पना आवडली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं कामाला सुरुवातही केलीय. राष्ट्रसंघात असा हा कार्यक्रम होण्याची ही पहिलच वेळ असावी. राष्ट्रसंघात या दिवशी कार्यक्रमासाठी हजारो अर्ज आले होते. पण कल्पना सरोज फाऊंडेशननं आपलं काम सुरु ठेवलं. त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर सरकारी पातळीवर या कार्यक्रमासाठी चक्र वेगाने फिरु लागली.
या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या कायम सदस्यांकडे सपुर्द करण्यात येणार आहे. औपचारीकता पूर्ण केल्यानंतर त्याचं अधिकृतरित्या अनावरण करण्यात येणार आहे. तसंच जगभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो व्यक्तींना आंबेडकररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात य़ेणार आहे.
कल्पना सरोज फाऊंडेशन या सर्व कार्यक्रमाची आखणी करण्यात गुंतलं आहे. कल्पना सरोज स्वता याच्यावर नजर ठेऊन असतात. बाबासाहेबांनी भारतात दलितांसाठी केलेलं काम जगभरात झालेले सर्वात मोठं सामाजिक एकात्मतेचं काम होतं. त्याची नव्यानं प्रचिती या कार्यक्रमामुळं जगाला होणार आहे.
नेल्सन मंडेला, गांधीजी यांच्या बरोबरीनं जागतिक पातळीवर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. बाबासाहेबाचं कार्य जगभरात पोचलं पाहिजे यासाठी फाऊंडेशनतर्फे अनेक कार्यक्रम ही हाती घेण्यात आले आहेत असं कल्पना सरोज यांनी सांगितलंय. हा कार्यक्रम म्हणजे जागतिक पातळीवरचा अश्याप्रकारचा पहिलाच कार्यक्रम असेल.