‘बिझनेस प्लॅन’विनाच जमवले २ दशलक्ष अमेरिकन डॉलर… शिका यशाचा ‘राघव’मंत्र!

‘बिझनेस प्लॅन’विनाच जमवले
२ दशलक्ष अमेरिकन डॉलर…
शिका यशाचा ‘राघव’मंत्र!

Friday October 09, 2015,

4 min Read

कुणी भरवसा ठेवेल? प्लॅन नाही, की काही नाही एक जण उठतो. गुंतवणूकदारांना उद्देशून म्हणतो, ‘उद्योग उभा करतोय’ आणि चक्क दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी अगडबंब रक्कम चुटकीसरशी गोळाही होते. तुम्हाला धक्का नाही बसला? बसला ना! हो! धक्कादायक आहेच हे! पण खरेही आहे ना… आता त्याला करता काय? राघव केके यांनी ही धम्माल उडवून दाखवली. गेले काही दिवस औद्योगिक वर्तुळातील गप्पाष्टकांमध्ये म्हणून त्यांच्याच नावाचे ‘जलवे’ होते! राघव यांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट कशी शक्य करून दाखवली, याबद्दल कुणालाही उत्सुकता वाटेल… चल जाणून घेऊया…

image


कसे शक्य झाले हे?

बघा… बिझनेससाठी भांडवल उभारायचे तर राघव यांच्यासमोर फक्त दोन पर्याय होते. एक फॉर्म्युला तसा जुनाच होता. अनेक जणांनी वापरून झालेला. आणि दुसरा एक नवा पर्याय होता… पण हा मार्ग तसा अवघड… म्हणजे फार आडवळणाचा म्हणून चालायला कष्टप्रद, फार कमी लोक त्याची तसदी घेतात. राघवलाही या दुसऱ्या मार्गावर चालणे कष्टप्रद आहे, हे ठाऊक होते, पण याच मार्गावरून पोहोचणे आपल्याला शक्य आहे, ही खात्रीही कुठेतरी होतीच आणि म्हणून त्यांनी दुसरा पर्याय निवडला.

पहिल्या पर्यायात काय करायचे असते तर तुम्हाला एक ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ करायचे असते. नंतर ‘एंजिल’ गुंतवणुकदारांच्या भेटीची तजवीज तुम्हाला करावी लागते. आणि तदनंतर तुम्हाला तुमची गोष्ट सांगायला १५ ते २० मिनिटे दिली जातात. तुमचे सादरीकरण गुंतवणूकदारांना भावले, तुमच्या संभाव्य धंद्यात भाविष्यातील फायद्याच्या संधी त्यांना दिसल्या तर ते तुमच्या पुढ्यात काही प्रश्न टाकतात. तुम्ही त्या प्रश्नांवर त्यांचे (गुंतवणूकदारांचे) समाधान होईल, अशी उत्तरे देऊ शकलात तर मग कितीतरी प्रकारच्या ‘टर्म्स’ आणि ‘कंडिशन्स’ तुम्हाला घातल्या जातील आणि असे मग या संपूर्ण प्रक्रियेला पुढेही बराच वेळ जावा लागतो. थोडक्यात ‘थकवणूक’ खूप होते मग होते गुंतवणूक! द्राविडी प्राणायाम करत बसण्यापेक्षा म्हणूनच राघवने दुसरा मार्ग निवडला. ‘एंजिल’ऐवजी ‘व्हीसी’ गुंतवणूकदारांच्या भेटीची वेळ मागून घेतली आणि गुंतवणूक दारांना सांगितले, की तुम्हीच ३० मिनिटे माझा (राघव यांचा) इंटरव्ह्यू घ्या. पण झाले उलटे राघवच गुंतवणूकदारांच्या पुढ्यात प्रश्न टाकत गेला. कशाप्रकारे गुंतवणूकदार या नव्या बिझनेसमध्ये उपयुक्त ठरू शकतात, कशाप्रकारे मदत करू शकता इत्यादी, इत्यादी… राघव यांना जाणवले, की ते केवळ भांडवल गोळा करत नाहीयेत तर यशस्वी उद्योजकांकडून यशाचा कानमंत्रही घेत आहेत. राघव सांगतात, ‘‘मुलाखतीच्या या सोपस्कारानंतर त्यांनी एक टर्मशिट बनवली. सर्व संभाव्य गुंतवणूकदारांची व्यक्तिश: भेट घेतली. ३० जणांना ते असे भेटले. दहा दिवसांची मुदत राघव यांनी त्याकरिता स्वत:साठी ठरवून घेतलेली होती. अर्थात या गुंतवणूकदारांमध्ये बरेच लोक असे होते, जे राघव यांनाही आणि त्यांच्या कार्यशैलीला बऱ्यापैकी ओळखून होते. ज्यांना हे माहित नव्हते, त्यांचे समाधान राघव यांनी आपल्या मित्रांच्या माध्यमातून केले. म्हणजे असे गुंतवणूकदार आणि राघव यांच्यातल्या ‘कॉमन फ्रेन्डस्’नी राघव पैसा बुडू देणार नाही म्हणून गुंतवणूकदारांना आश्वस्त केले.

भांडवल जमा करण्यासाठी राघव यांनी कुठल्याही ‘एंजिल लिस्ट’चा वापर केला नाही. ऐवजी सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या एका मित्राला फोन केला आणि त्याच्या घरात काही दिवस राहण्याची परवानगी मागितली. या मित्राची कारही इतके दिवस वापरली. राघव यांची पत्नी नेत्रा यांनी यादरम्यान न्युयॉर्कमधल्या आपल्या घरातूनच गुंतवणुकदारांसमवेतच्या बैठकांसाठी बुकिंग करायला सुरवात केलेली होती. नेत्रा या कंपनीच्या सहसंस्थापक व सीओओ आहेत. अशा पद्धतीने राघव यांच्या जवळपास पाच मिटिंग्ज् झाल्या. राघव यांची कल्पना काहींनी स्वीकारली नाही. अडचणी सांगितल्या. नकार देणाऱ्या अशा गुंतवणूकदारांवर नाराज न होता राघव त्यांनाच सांगत मग तुम्ही असे काही तुमचे मित्र सूचवा ना, ज्यांना माझ्या कल्पनेत रस असेल. शक्य त्या अशा सगळ्या पद्धती वापरून राघव यांनी आपल्या कक्षेत गुंतवणूकदारांचा गुणाकार करत नेला. अखेर अगदी थोड्या कालावधीत राघव यांनी दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर जमवूनच घेतले. राघव यांना भेटल्यानंतर आणि त्यांची संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर एक गोष्ट आरशासारखी स्वच्छ समोर येते ती म्हणजे… राघव यांचा व्यावहारिक दृष्टिकोन हाच त्यांच्या यशाचे खरे कारण आहे. हे अगदी खरे आहे, की काही गुंतवणूकदार राघव यांच्या परिचयातले होते, पण राघव आपल्या विश्वासार्हतेचा डंका केवळ या बळावर वाजवू शकले नसते… शकलेच नसते…

स्वच्छ आणि सचोटीच्या व्यवहाराचे राघव यांचे ट्रॅकरेकॉर्डच या डंक्याचा खरा ध्वनी होता. पराभव न स्वीकारण्याची वृत्ती, जिद्द, कष्ट करण्याची क्षमता आणि ध्येयासमोर संपूर्ण समर्पण हे असे सगळेच राघव यांचे गुण राघव यांच्या यशामागे आहेत… अत्यंत विपरित परिस्थितीतही राघव यांनी या गुणांना आपल्यापासून दूर पळू दिलेले नाही… लवकरच ते आपल्या माध्यमातून सर्वांसाठी यशाचा कानमंत्र देणार आहेत आणि स्वत:चे काही अनुभव सांगणार आहेत… खचितच ते प्रेरक असतील…