उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी दहा प्रकारे पाणी वाचविता येईल, त्याकरिता महत्वाच्या टिप्स!
Tuesday September 20, 2016,
3 min Read
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून भीषण पाणीटंचाई जाणवत असून मागील एप्रिल-मे महिन्यात मराठवाड्यात उद्योगांना पाणी नसल्याने ते बंद पडल्याचे दिसून आले आहे. इतकेच काय राज्याला वीज पुरवठा करणा-या परळी औष्णिक वीज केंद्राचे वीज उत्पादनही सध्या पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले आहे. कोणत्याही मोठ्या उद्योगासाठी ज्या महत्वाच्या पायाभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्यात पाणी, वीज, जमीन आणि श्रम या चार महत्वाच्या बाबी असतात, त्याचबरोबर कच्चा माल आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाणी मुबलक असेल तर स्वस्तात मिळू शकते अन्य़था उद्योगासमोर अडचणी येऊ शकतात.
हवामान बदलामुळे पाण्यावर आधारित उद्योगांना आता पुरेसे पाणी मिळणे अशक्य होऊ लागले असून त्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याची गरज निर्माण होऊ लागली आहे. येत्या दहा वर्षात जगभराची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढेल, त्याच प्रमाणात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट गहिरे होत जाणार आहे त्यामुळे जलतज्ज्ञ या धोक्यापासून कसे वाचता येईल याच्या तळाशी जाऊन विचार करू लागले आहेत. अनेक उद्योग सध्या पाणी विकत घेत आहेत आणि त्यांना त्याकरिता हजार गॅलनसाठी दहा ते वीस डॉलर्स मोजावे लागत आहेत. गेल्या तीस वर्षापासून पाणी वाचविण्याचे अनेक उपाय त्यामुळेच केले जात असून मोनसँटो तांत्रिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत पाणी वाचविण्याच्या अनेक उपायांची चर्चा केली जात आहे. ज्यामुळे भांडवली गुंतवणूक देखील वाचेल असे अनेक उपाय यात समाविष्ट आहेत. त्यातील दहा महत्वाच्या उपायांची माहिती घेऊ या.
१) स्वच्छतेसाठी पाण्याचा कमीत कमी वापर करा, त्यासाठी ड्राय क्लिनींग मेथडचा वापर करा. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनावरील खर्च देखील कमी होऊ शकतो.
२) पाण्याची गळती होण्याची शक्यता कमी करा, जेथे ती होत असेल तेथे तातडीने ती बंद कशी करता येईल ते पहा. त्यासाठी पाणी पुरवठा केल्या जाणा-या उपकरणांची नियमित देखभाल आणि तपासणी करून ती चांगल्या अवस्थेत असतील याची खात्री करून घ्या.
३) पाण्याचा वापर करून केले जाणारे उत्पादन नव्या पध्दतीने कमी पाण्यात कसे करता येईल याचे संशोधन करून ते अंमलात आणा त्यातून उत्पादन खर्च देखील कमी होण्यास मदत होईल.
४) शक्यतो स्वयंचलित यंत्राचा वापर करा त्यातून पाण्याचा नेमका आणि नियंत्रित वापर करणे शक्य होईल आणि अपव्य़य टाळता येईल.
५) एअर कुलींगसाठी वापरल्या जाणा-या पाण्याचा फेरवापर करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे पाण्याचा अपव्यय आणि जास्तीचा खर्च टाळता येईल.
६) उत्पादनात वाफेचा वापर केला जात असेल तर वाया जाणा-या वाफेचा फेरवापर कसा करता येईल याचा विचार करा त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करता येईल आणि उत्पादन खर्चातही कपात करता येईल.
७) उत्पादनासाठी जुनी यंत्रणा बदलताना नवी अशी यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पाणी आणि वीज यांची बचत होऊन उत्पादनाचा खर्च कमी करता येईल.
८) वाया जाणारे पाणी कमीत कमी असेल याची काळजी घ्या. त्याचा फेरच वापर करून अन्य कामासाठी ते कसे वापरता येईल याची काळजी घ्या. उदाहरणार्थ कुलींग नंतर तेच पाणी झाडांना किंवा उपकरणांच्या स्वच्छतेसाठी वापरता येऊ शकते.
९) पाण्याच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरा त्यामुळे त्याचा फेर वापर करणे शक्य होईल आणि पाण्याचा खर्च कमी करता येईल.पाणी वाचले तर तुमचा महत्वाचा खर्च वाचेल ज्यातून तुम्हाला इतर काही महत्वाच्या बाबीवर खर्चा साठी भांडवल निर्माण करता येईल.
त्यामुळे पाण्याचा परिणामकारक वापर करून तुम्हाला वेळ पैसा आणि वीज यांची देखील बचत करता येणार आहे. वाचलेले पैसे हेसुध्दा उत्पन्ना सारखेच असतात. रोजच्या कामकाजात या गोष्टींचा विचार करा त्याने तुम्ही पृथ्वीवरील मर्यादीत पाण्याची बचत करून निसर्गाचे संवर्धन करण्यास हातभार लावत ासता हे लक्षात असू द्या. पाणी वाचवा, मानवी जीवन वाचवा!