पारंपारिक शिक्षण पध्दतीला रामराम

पारंपारिक शिक्षण पध्दतीला रामराम

Thursday October 29, 2015,

6 min Read

एकीकडे नामवंत अशा आयआयटी आणि आयएएससारख्या स्पर्धा परिक्षांमध्ये बिहारचे विद्यार्थी झळकतात तर दुसरीकडे भारतातील निरक्षरतेचा सर्वाधिक टक्का असणारं राज्य म्हणूनही बिहारची नोंद होते. २०१४ च्या एएसईआरच्या अहवालानुसार भारतातील शाळांमध्ये वाचनाचं प्रमाण झपाट्याने घसरत आहे. त्याचप्रमाणे सरकारी शाळांमध्ये आणि खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही वाचन श्रेणीतील अंतर वाढत असल्याचंही प्रकर्षानं समोर आलं आहे. व्यापकस्तरावर याचा विचार केल्यास पाचवीच्या वर्गातले निव्वळ पन्नास टक्के विद्यार्थी इयत्ता दुसरीचं पुस्तक वाचू शकतात आणि गणित तर खुपच कच्च आहे. ही फारच गंभीर बाब आहे. २०१४ मध्ये बिहारच्या ग्रामीण भागातील तिसरीच्या वर्गातील ३९.% विद्यार्थीच निव्वळ शब्द वाचन करू शकले. २०१० साली हे प्रमाण ७०. ८% इतकं होतं. तर दुसरीकडे २०१४ मध्येच पाचवीतील ४४. ६% विद्यार्थीच निव्वळ दुसरीच्या वर्गाचं पुस्तक वाचू शकले. ही आकडेवारी २०१० मध्ये ५७. इतकी होती.

image


क्षितीज आनंद आणि वत्सला हे दाम्पत्य बिहारमध्ये जन्मलेले. बिहारमधल्या शिक्षण समस्येला वाचा फोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. क्षितीज आयआयटी गुवाहटीचा विद्यार्थी. पुढे त्याने अमेरिकेतून पदवीत्तर शिक्षण घेतलं. रचना अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी असल्याने क्षितीजनं शैक्षणिक उपक्रमांसाठी विविध अभ्यासक्रम बनवले आणि अशापद्धतीने बनवलेल्या खास शाळांचा तो प्रमुखही आहे. दुसरीकडे त्याची पत्नी वत्सलानं मास कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवली होती. ती एनसीसीची कॅडेटही होती .

" आम्हा दोघांमध्ये एका गोष्टीवर सहमती होती ती म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास! मला वाटतं ही गोष्ट आम्हाला एकमेकांशी जोडायला कारणीभूत ठरली. हा बदल घडवण्यासाठी आम्ही फक्त योग्य संधीची वाट पाहत होतो. बिहारचे असल्यानं गरीबीच विदारक चित्रं आम्हीही पाहिलं होतं. आम्हाला असं जाणवलं की योग्य शिक्षणाच्या मदतीने आणि ते शिक्षण योग्य ठिकाणी मिळाल्यानं आर्थिक परिस्थतीत बदल घडवून आणणं, लोकांना सहज शक्य आहे." वत्सलानं आपलं मत मांडलं.

राज्यातल्या शिक्षणपद्धतीवर त्यांना काम करायचं होतं. पण शैक्षणिक असमानतेची समस्या इतकी जटील आणि व्यापक होती की त्यांना या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी संशोधन करावं लागलं. " आम्हाला शोधावं लागलं की शैक्षणिक क्षेत्रातल्या कोणत्या भागावर आपल्याला नेमकं काम करायचं आहे. त्यानंतर आम्ही अशा निष्कर्षावर पोहोचलो की आम्हाला शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा लागेल. मार्च २०१२ साली या दाम्पत्यानं हा प्रकल्प सुरु केला आणि एक वर्षानंतर ' हॅप्पी होरायझन ट्रस्ट ' नावानं संस्थेची नोंदणी करवून घेतली .

image


क्षितिजला त्याच्या आजीकडून या प्रकल्पासाठी सुरूवातीचं भांडवल मिळालं. वत्सला आणि क्षितीज यांनी २०१० मध्ये लग्न केलं होतं. क्षितिजच्या आजीनं वत्सलाचं नव्या घरातलं स्वागत करताना आपल्याजवळची पूंजी म्हणून ५००० रुपये दिले होते. वत्सला आणि क्षितीज यांनी याच आशीर्वादावर आपल्या सत्कर्माची मुहूर्तमेढ रोवायच ठरवलं.

नुसतेच बघे आणि त्यावरील उपाय :

शिक्षण पद्धतीत अनेक त्रुटीआहेत, हे मान्य करायलाच हवं. भारतात जरी युवकवर्ग मोठ्या संख्येनं असला तरी बेरोजगारी ही देशापुढील मोठं आव्हान आहे. क्षितीज पुढे म्हणतो ," मुलांना सरकारी शाळेत जायला प्रेरीत करण्यासंदर्भात उदासीनता दिसते. आपण नुसते अहवाल वाचतो, की भारतातील शिक्षण पद्धतीचा ऱ्हास झाला आहे. पाचवीतल्या मुलांना दुसरीच्या वर्गाचं पुस्तक वाचता येत नाही. त्याचबरोबर शिक्षकांची गुणवत्ता ही सुद्धा मोठी समस्या आहे. "

image


" दहावीतल्या मुलांना जर आत्मविश्वासाने वाचता येत नसेल किंवा स्वतःला व्यक्त करता येत नसेल तर या शिक्षणाचा उपयोग काय ? वत्सला म्हणते . हैप्पी होरायझन ट्रस्ट (एचएचटी) ही संस्था शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर भर देते. ज्यामध्ये, वक्तृत्व, वाचन, बिजगणित, आत्मविश्वास इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या योग्य पर्यायांची निवड करायला संधी मिळते .

परिणाम :

एचएचटी सध्या बिहारमधल्या ६ जिल्ह्यांतील ३० शाळांमध्ये कार्यरत आहे. सहरसा ,खगरिया ,सुपौल, माधेपुरा, पूर्णिया, आणि कटिहार. सध्या एचएचटी सरकारी शाळांमधील आणि माफक खाजगी शाळां (एपीएस) मधील विद्यार्थ्यांसोबत काम करत आहे. प्रत्येक वयोगटासाठी इथं वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. क्षितीज याबाबत म्हणतो " आम्ही प्राथमिक शाळांपासून सुरुवात केली आणि हळूहळू अन्य वर्गांचाही समावेश करण्यात आला. या प्रकल्पात सहभाग शिक्षण आणि पर्यायी शिक्षण उपक्रम यावर भर देण्यात आला आहे. सहभाग शिक्षण पद्धत हा उपक्रम प्राथमिक शाळांतील मुलांसाठी आहे आणि संस्थेचा सर्वात मोठा उपक्रम जो ते विविध शाळांमध्ये राबवत आहेत. शाळांमधील मध्यस्थीचा अर्थ शिक्षकांना कामावरून कमी करणे असा नाही तर त्यांना सहाय्य करणे असा आहे. या सत्रात शिकवणारे प्रशिक्षक शिक्षण हे मनोरंजनाने ही शिकता येतं हीच शिकवण देतात . याचा परिणाम म्हणून शाळेतून विद्यार्थ्यांची गळती होण्याचे प्रमाण कमी झालं आहे. दृकश्राव्य माध्यमातून शिकण्याच्या उपक्रमांतर्गत शिक्षण देताना शैक्षणिक चित्रपट माध्यमातून शिकणं ही मजेशीर बाब आहे, हे त्यांना पटलं. २६ शाळांमध्ये आम्ही तब्बल १०० सिनेमे दाखवले आहेत. यानंतर चर्चा आणि संवाद असे उपक्रम ही राबवण्यात आले. या सर्वातून मुलांनी फिल्ममेकर व्हायची इच्छा सुद्धा बोलून दाखवली. "करियर जागृती संदर्भातही संस्था मार्गदर्शन सत्र भरवते, ज्यामध्ये पालकही सहभागी होऊ शकतात. आजवर तब्बल २०० विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेतला आहे

image


एचएचटीला आता जाणीव झाली आहे की विद्यार्थ्यांना आता शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं आहे. त्यामुळे आता अधिकाधिक माहीतीचा खजिना त्यांच्यासाठी खुला करावा लागणार आहे. मोबाइल फोनचं वाढत प्रस्थ आणि गावागावात उपलब्ध असलेल्या इंटरनेटचा वापर करायचा ठरवून संस्थेनं ‘डिजिटल लिटरसी' आणि इंटरनेट अवेरनेस हे दोन उपक्रम राबविले. ज्यात उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना आपलं लक्ष्य करण्यात आलं आहे. या उपक्रमाचा फायदा तब्बल १५० विद्यार्थ्यांना झाला असून आता ते इतर विद्यार्थ्यांनाही शिकवीत आहेत. म्हणजे जसे पाण्यात तरंग उमटतात त्याचप्रमाणे ते स्वत: शिकून इतरांना साक्षर करताहेत .

कार्यपध्दती :

ही सत्र शिकवणाऱ्या प्रशिक्षकांना चॅम्पियन्स असं म्हटलं जातं. संस्था त्यांना स्वर्गीय रुक्मिणी देवी यांच्या नावानं शिष्यवृत्तीही देते. तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळालेला सदस्य उच्च माध्यमिक वर्गातल्या मुलांसाठी सहभाग शिक्षण उपक्रम राबवतो. ज्यामध्ये कथा सांगणे, पुस्तक वाचणे, खेळातून प्रशिक्षण, आणि दृकश्राव्य माध्यमातून शिकणे याचा अंतर्भाव आहे. वत्सल सांगते की या सत्रांसाठी मुलं नेहमीच आतुर असतात . कारण हसत खेळत अभ्यास करण्याची ही एक संधी त्यांच्यासाठी असते. या शाळांकडून आम्ही शुल्कसुद्धा घेत नाही.

संस्थेला सध्या , मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून निधी मिळतो आहे. ज्यामधून त्यांचा खर्च भागतो. क्षितीज पुढे म्हणतो." नुकताच आम्ही बाल चित्रपट महोत्सवामध्ये एक प्रकल्प पूर्ण केला ज्यामुळे या आर्थिक वर्षात आमचे शैक्षणिक उपक्रम पुढे राबवायला मदत होणार आहे." भविष्यात मात्र निधीसाठी आम्ही विविध खाजगी संस्थांची मदत घेणार आहोत. म्हणजे त्यांच्याकडून निधी, अनुदान अशा प्रकारे वित्तीय तरतूद करून आमचे उपक्रम आम्हाला पुढे सुरु ठेवता येतील”.

image


एचएचटी अनेक सरकारी आणि अन्य संस्थांशीही संलग्न आहे, जसं चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी. क्षितीज म्हणतो, " आमच्या दिल्लीच्या कार्यालयात, धोरण आणि नियोजन आदी बाबी बघितल्या जातात तर बेंगळूरूच्या कार्यालयात समन्वयासंदर्भातल्या बाबी हाताळल्या जातात. २०१६ सालच्या मध्यापर्यत आम्ही दिल्ली , कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील राज्यात आमच्या कार्याचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे. आम्ही प्रथम बुक्स आणि टिच फाॅर इंडिया अशा संस्थांशी सलग्न होण्याच्याही तयारीत आहोत.”

अडथळे आणि प्रवास

क्षितीज म्हणतो की लोकांना बिहार मध्ये कामासाठी आणणं, हे सर्वात मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. त्याप्रमाणे व्यावसायिकता हे दुसरं आव्हान होतं, योग्य प्रतिभा शोधणं हे आव्हान होतं आणि दुसऱ्या बाजूला पालकांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगणं. जेणेकरून विद्यार्थ्यांना ते शिक्षणासाठी प्रवृत्त करतील. हे तर मोठ आव्हान होतं तो पुढे म्हणतो, " लोकांना आपल्या समस्येवर त्वरित समाधान हवं असत हे एक मोठं आव्हान आहे कारण शिक्षण क्षेत्रात काम करताना फार दूरवरचा विचार करावा लागतो. त्यासाठी लागणारा संयम हे मोठं आव्हान आहे. जाताजाता , क्षितीजनं एक सुंदर अवतरण सांगितलं, ते म्हणजे , सर केन रॉबीनसन यांच्या ‘द एलिमेन्ट - हॉव फाईडिंग युवर ऑशन चेंजेस एवरीथिंग' पुस्तकातली वाक्य " आपल्याला आव्हानं समोर दिसली की आपण त्याचा मुकाबला करतो, शिक्षणात सुधारणा नकोय तर बदल हवाय आणि या बदलाच उत्तर हे शिक्षण प्रमाणित करण्यात नव्हे तर वैयक्तिकरित्या देण्यात आहे. प्रत्येक मुलाची वैयक्तिक प्रतिभा शोधून काढणं मुलांना अशा वातावरणात ठेवणं जिथे त्यांना शिकायला आवडेल आणि ते स्वतःच आपली प्रतिभा आपली आवड ओळखू शकतील. याच सूत्रावर हैप्पी होरायझन ट्रस्टची स्थापना झाली आहे आणि हेच सूत्र त्यांच दीपस्तंभही आहे.