पुरुषांच्या वर्चस्वासमोर 'यूटीव्ही'चे विश्व उभे करणा-या जरीन स्क्रूवाला

पुरुषांच्या वर्चस्वासमोर 'यूटीव्ही'चे विश्व उभे करणा-या जरीन स्क्रूवाला

Monday November 09, 2015,

6 min Read

मनोरंजन विश्वात १९९० च्या दशकात पुरुषांचेच साम्राज्य होते. पुरुषी वर्चस्वाच्या या क्षेत्रात पाय रोवण्याचं स्वप्न एखादीच भाऱतीय महिला बघत असावी. पण ते स्वप्न जरीन स्क्रूवालांनी पाहिलं. त्यांनी रॉनी स्क्रूवाला यांच्यासोबत १९९० मध्ये यू टीव्हीची स्थापना केली. दोन दशकानंतर वॉल्ट डिज्नी यांनी ४५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मोजून यू टीव्ही खरेदी केलं. जरीन यांनी उभारलेल्या स्थायी व्यवसायाची साक्ष देणारा हा व्यवहार होता.

जरीन स्क्रूवाला यांनी आपल्या यशाचं रहस्य 'यूअर स्टोरी'शी शेअर केलं.

जरीन स्क्रूवाला

जरीन स्क्रूवाला


मला शिक्षकांनी घडवलं

मी मुंबईच्या जेबी पेटीच स्कूल ऑफ गर्ल्समधून शिक्षण घेतलं. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका अत्यंत सुधारणावादी विचारांच्या होत्या. महिलांना काहीही अशक्य नाही,त्या घराच्या बाहेर पडल्यानंतर सर्व कामं करु शकतात हा त्यांचा ठाम विश्वास होता. वयाची साठी ओलांडलेल्या आमच्या हेडमास्तरीण बाईंनी मुलींच्या एका पिढीला आपल्या या ठाम विचारांनी प्रेरणा दिली. याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. केवळ पाठांतर करणे म्हणजे सर्वकाही नाही, हे त्यांनीच मला शिकवलं. त्यामुळेच माझी जिज्ञासू वृत्ती वाढली. कोणत्याही विषयाच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याची सवय मला जडली. त्यांच्यानंतरचे माझे दुसरे गुरु म्हणजे पर्ल पद्मसी. थिएटर विश्वातलं मातब्बर व्यक्तीमत्व. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाची प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. एक अत्यंत लाजाळू मुलीला आत्मविश्वास देण्याचं काम पर्ल यांनी केलं.

ज्या मुल्यांची मी आयुष्यभर जपणूक केलीय त्यामधली बहुतेक मुल्य याच सुरुवातीच्या शिक्षकांनी माझ्यात रुजवली आहेत.

जेव्हा व्यापार विश्वात जाण्याचा किडा माझ्या डोक्यात शिरला...

‘मशहूर महल’साठी साह्यक दिग्दर्शिका म्हणून काम करण्यास तयार आहेस का ? असा प्रश्न माझ्या मित्रानी मला एकदा फोनवर विचारला. तेंव्हापासून स्वत:चा व्यवसाय करण्याची माझी इच्छाशक्ती प्रबळ झाली. दुरदर्शननं निर्माण न केलेली ती भारतामधली पहिली मालिका होती. ही फक्त सुरुवात होती. मीडिया आणि टेलिव्हिजन या क्षेत्राच्या लवकरच मी प्रेमात पडले. मला आजही माझ्या कामाचा पहिला दिवस आठवतो. त्यादिवशी मी सकाळी ७ वाजता प्रोडक्शन हाऊसला पोहचले होते आणि दुस-या दिवशी सकाळी सात वाजता तिथून बाहेर पडले. त्यावेळी मी प्रचंड उत्साहात होते.

माझा प्रवास सोपा नव्हता

एक उद्योजक म्हणून कधीही हार न मानण्याच्या सकारात्मक वृत्तीनं तुम्ही काम केलं पाहिजे, हा व्यापार विश्वाचा पहिला धडा असतो. विशेषत: सुरुवातीच्या टप्प्यात. कारण हा सर्वात खडतर टप्पा असतो. एका यशस्वी गोष्टीचा मागोवा घेताना सर्वांनाच छान वाटतं. पहिल्या दिवसापासून तुम्ही यशस्वीतेच्या शिड्या चढू लागला का ? याचा विचार तुम्ही करु लागता. यशस्वी होण्याचा माझा प्रवास ख़डतर होता. या प्रवासात अपार कष्ट होतेच, पण त्याचबरोबर मजा मस्तीही होती. कधीही हार न मानण्याची माझी वृत्ती हीच माझी सर्वात मोठी जमेची बाजू होती, हे मी अनुभवातून नक्की सांगू शकते. लोकांना नेहमी दुस-यांच्या य़शाच्या गोष्टी सांगायला आवडतात. पण प्रत्येक यशस्वी कथेच्या मागे अपयशांची मालिका असते. जी जगासमोर येत नाही. तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवून नेहमी पुढे जायला हवं. कारण सुरुवातीच्या टप्प्यात यशापेक्षा अपयशच जास्त येतं. त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता सतत पुढे जा. भारतासारख्या देशात अपयशाला पाठिमागे टाकून पुढे जाण्याची जिद्द कायम ठेवणं अत्यंत आव्हानात्मक आहे. इथे सगळ्यांना तुमचं यश माहिती असतं. तसंच अपयशाचीही सारी माहिती लोकांना असते.

ग्रामीण सशक्तीकरणावर आमचं लक्ष आहे

'यूटीव्ही' पासून २०११ मध्ये मी वेगळी झाले. त्यावेळी पुढे काय करायचं या विचारात मी होते. नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज होते. त्यावेळी स्वदेस फाऊंडेशनचा विचार माझ्या मनात आला. पाच वर्षात १० लाख लोकांना गरिबीतून बाहेर काढणे हे स्वदेसचे एकमेव लक्ष्य होते. 'यूटीव्ही'तून बाहेर पडण्यापूर्वीही मी या विषयाचा विचार केला होता. 'यूटीव्ही' उद्योगानेच मला इतक्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्याचं बळ दिलं.

आम्ही आमचं सारं लक्ष्य ग्रामीण भागावर केंद्रीत केलं होतं. या भागातल्या विकासाची गतीमध्ये आजवरच नेहमीच चढउतार राहिलेले आहेत. ग्रामीण भागात राहाणा-या बहुतेक मंडळींना पायाभूत सुविधा आणि योग्य संधी मिळण्यास संघर्ष करावा लागतो. त्याचबरोबर त्यांच्यासमोर शिक्षणाचे पर्यायही कमी आहेत. शिक्षणाची संधी मिळण्याची त्यांना प्रतीक्षा करावी लागते. आम्ही या विषयावर भरपूर विचार केला. त्यानंतर या विषयावर तोडगा काढण्यासाठी विचारांच्या पद्धतीमध्ये ३६० अंशाचा बदल करण्याची गरज असल्याचं आम्हाला जाणवले. आम्ही विकासाचे स्थायी मॉडेल विकसित केले. ज्याची पुनरावृत्ती करणे शक्य आहे. आम्ही सामुहिक एकत्रिकरण, कृषी, शिक्षण तसेच आरोग्य या सारख्या विषयांवर फोकस ठेवून आम्ही पुढे सरकत आहोत. यासाठी १०८ सदस्यांच्या आमच्या टीममधले ८० जण कायम फिल्डवर असतात. आम्ही ग्रामीण सशक्तीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकांना सशक्त बनवण्याबरोबरच स्वत:साठी पर्याय शोधण्यासाठी मदत करणे हे आमचे काम आहे.

स्वत:चं लक्ष्य निश्चत करा, ते साध्य करण्यासाठी झोकून द्या

माझा सर्व महिला उद्योजकांना सल्ला आहे, स्वत:साठी लक्ष्य निश्चित करा, ते साध्य करण्यासाठी सर्वस्व झोकून द्या. तुमच्या चारही बाजूला संशयाचा डोंगर उभा राहिल, पण त्या डोंगराखाली दबून जाऊ नका. स्वत:च्या लक्ष्यावर फोकस ठेवा. प्रत्येक अपयशानंतर तुम्ही तुमचं लक्ष्य बदलू लागला तर तुम्हाला कोणतंच लक्ष्य पूर्ण करता येणार नाही.

काही गोष्टी करताना अशी वेळ येते की तुम्ही काळाच्या पुढे असता, किंवा काळाच्या बरचं पाठिमागे पडलेला असता. काळाचे भान राखणे हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाब आहे. जर तुमचे टायमिंग योग्य नसेल तर व्यापार करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. जर जवळपासची मंडळी तुमची डोकेदुखी असतील तर त्याचा बंदोबस्त करता येऊ शकतो. अन्य अडचणींवरही तोडगा शक्य आहे. पण तुम्ही तुमच्या व्यवसायाचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

मला आव्हानं आवडतात

मी कधीही महत्वकांक्षी नव्हते. आव्हानं स्वीकारायला आणि ती पूर्ण करायला मला आवडतात. या दोन्ही अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. जर कोणी महत्वकांक्षी आहे तर याचा अर्थ तो यशासाठी भुकेला आहे. पण मी कधीही यशाच्या पाठीमागे धावले नाही. अवघडातील अवघड काम करण्यामध्ये मला नेहमी रस असतो. आम्ही यू टीव्हीच्या माध्यमातून देशातल्या एक अत्यंत आधुनिक आणि नाविन्यपूर्व व्यवसाय उभारला. २००४ साली आम्ही संपूर्णपणे मुलांना वाहिलेली हंगामा ही वाहिनी सुरु केली. यू टीव्ही बिंदासची गोष्टही अशीच काहीशी आहे. हंगामा नंतर परदेशातही अशा प्रकारच्या वाहिनी सुरु करण्यास आम्ही मदत केली.

आयुष्याच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या आव्हानांचा आनंद पुरेपूर घेण्यावर माझा विश्वास आहे. जर या प्रवासात यश मिळालं तर याच्यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली गोष्ट नाही.

पाच वर्षात दहा लाख लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणे हे स्वदेस फाऊंडेशनचे लक्ष्य आहे. हे एक मोठे आव्हान आहे. पण हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. अशा प्रकारची आव्हानंच मला पुढं जाण्यासाठी प्रोत्साहित करतात.

आयुष्याचे धक्के पचवलेल्या व्यक्तींच्या शोधात...

माझ्या मते एक चांगला व्यावसायिक व्यक्तीच पुढे उद्योजक म्हणून यशस्वी होते. ती ऊर्जा ते समर्पण आणि टिकून राहण्याची जिद्द याला सर्वाधिक महत्त्व आहे. जेंव्हा मी कुणाला नोकरी देते त्यावेळी आयुष्याचे धक्के पचवलेल्या व्यक्तीला मी प्राधान्य देते. त्याचबरोबर सकारात्मक वृत्ती ही महत्त्वाची आहे. काही लोकांकडे उत्तम व्यावसायिक अनुभव असतो. तसंच ते आपल्या कामातही कुशल असतात. पण शेवटी सकारात्मक वृत्तीच्या लोकांचाच विजय होतो.कृपया या सकारात्मकतेची तुलना साधेपणाशी करु नका.

चांगली टीम बनवणे हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. मला हवी असलेली गुणवत्ता ज्याच्या अंगी आहे, आणि यशस्वी होण्याच्या सर्व गोष्टी जवळ असलेल्या व्यक्तींच्या शोधात मी नेहमी असते. एका यशस्वी टीमच्या निर्मितीसाठी संवादाची मोठी आवश्यकता असते. हा संवाद कायम राहावा याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. त्याचबरोबर लोकांशी आदर आणि सन्मान ठेवूनच व्यवहार करायला हवा. यामधूनच चांगल्या टीमची निर्मिती होते.

स्वत: बरोबरच कुटुंब आणि मित्रांसाठीही वेळ काढा

स्वत:साठी वेळ काढा. आपला परिवार आणि मित्रांनाही वेळ द्या, बाजूला काढलेला वेळ याच व्यक्तींसोबत गेला पाहिजे याची काळची घ्या. त्याचबरोबर तुमचा व्यक्तिगत वेळ स्वत:वर खर्च करणेही अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही त्यावेळी चहाचा आनंद लुटा किंवा आवडीचं कोणतं पुस्तक वाचा किंवा तुम्हाला ऊर्जा आणि आनंद मिळवून देणारी एखादी गोष्ट करा.या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कितीही कष्ट करा पण या गोष्टींची अंमलबजावणी केली तरच यशस्वी होऊ शकाल.